बीड : राज्य घटना वाचविण्यासाठी देशात लाट निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी ३२ ते ३५ जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यानंतर महाविकास आघाडीची सभा झाली. त्यात पाटील म्हणाले, आमच्याकडे नेते जास्त नाहीत, पण जनता आमच्याकडे आहे. सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता असताना ते जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत. जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या जबाबदारी भाजप पेलू शकला नाही.‘जीएसटी’ने शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनता हैराण झाली आहे. आतापर्यंत देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी केलेल्या विकासाला शून्य ठरविण्याचे कटकारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. भाजपच्या नेत्यांनी टीकाटिपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले.
सोनवणे यांचा अर्ज दाखल
लोकसभेच्या बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारी बजरंग सोनवणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. विविध देवदेवतांचे दर्शन, लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले.