जालना : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील मौजे बनटाकळी येथील शेतकरी दाम्पत्याने पीक कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केली आहे. अशोक नानासाहेब कानकाटे (वय-४१) आणि संगीता अशोक कानकाटे (वय-३८) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे.
अशोक कानकाटे यांच्यासह त्यांच्या पत्नीने विष प्राशन करून जीवन यात्रा संपवली. बनटाकळी येथील शेती गट नंबर ५ मधील शेतात असलेल्या गोठ्यात गुरुवारी सकाळी दोघे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.
अशोक कानकाटे आणि संगीत कानकाटे या दाम्पत्याने कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. कानकाटे यांनी खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, असा मोठा प्रश्न या दाम्पत्यासमोर होता. अखेर या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कानकाटे दाम्पत्याने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे बनटाकळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.