पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी होणा-या बैठकांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. सरकारमध्ये असतानाही शिंदेच सर्व निर्णय घेत होते, याचा मी साक्षीदार आहे. तरीही शिंदे यांनी ठाकरे यांचा विश्वासघात केला, अशी टीका काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, अजित दरेकर यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘यापूर्वी राज्यात होणा-या निवडणुकांना राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे अजित पवार जागा ठरवत. त्यात शरद पवार कधीही हस्तक्षेप करत नव्हते.
मात्र आज अजित पवारांची अवस्था काय आहे. त्यांनी आज एवढे मिंधे होण्याची गरज काय? भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले. महाविकास आघाडीच्या काळात या दोघांना जी उंची होती; ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजपबरोबर जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.’’