छिंदवाडा : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी जबलपूरमधून निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. मी कोणत्याही परिस्थितीत छिंदवाडा सोडणार नाही, असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.
सोमवारी कमलनाथ यांना पत्रकारांनी जबलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेबाबत विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशी कोणतीही योजना नाही. मी कोणत्याही परिस्थितीत छिंदवाडा सोडणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील काँग्रेसचे सर्व बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असून आगामी काळात अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, सुरेश पचौरी आणि अरुणोदय चौबे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तर छिंदवाडा भागातीलही अनेक नगरसेवकांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे कमलनाथ जबलपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत असे बोलले जात होते.मात्र, कमलनाथ यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत छिंदवाडा सोडणार नाही, असे स्पष्ट केले.