लातूर : प्रतिनिधी
जानेवारी ते मे या दरम्यान जिल्ह्यातील उन्हाचा पारा ३७ ते ४० अंश सेल्सिअसवर पोहोचत असताना रक्तदात्यांची संख्यादेखील कमालीची घटल्याची पाहवयास मिळाली आहे. परिणामी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तसंकलन कमी तर मागणी अधिक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल गरीब, सामान्य रुग्णांना वेळीच रक्तपुरवठा होत नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहेत. हल्ली ३० ते ४० टक्के रक्ताची कमतरता जाणवत आहे. जिल्ह्यात पाच रक्तपेठया आहेत. शहरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची रक्तपेठी तर चार खासगी रक्तपेठ्या आहेत. शहरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची रक्तपेठीतून रुग्णालयातील रुग्णांना रक्त पुरवठा केला जातो. मात्र मार्च महिन्यापासून रक्तपेढीत रक्त्ताची कमतरता ही नित्याचीच बाब झाली आहे. एप्रिल ते जुन या दरम्यान रक्तदान शिबिरांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. तर दुसरीकडे स्त्री रुग्णालयात दरदिवसाला १५ ते २० रक्ताच्या पिशव्या पुरवठा करताना शासकीय रक्तपेठीतील कर्मचा-यांची दमछाक होत आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात ८ कॅम्प घेऊन २६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून फेब्रुवारीत २० कॅम्प घेऊन ९१०, मार्च ११ कॅम्प घेऊन ४०२, एप्रिल १७ कॅम्प घेऊन ६३६, मे ८ कॅम्प घेऊन २३२ तर जुन महिन्यात ७ कॅम्प घेऊन २३४ जणांनी रक्तदान केल्याचे अभिलेखात नोंद आहे. यंदा फेब्रुवारी ते मे या दरम्यान रक्त संकलनाची संख्या फारच कमी आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे उपचारासाठी येणा-या सिकलसेल, हिमोफेलिया व थायलेसिला रुग्णांनाही मोफत रक्तपुरवठा करावा लागतो. गत दहा ते पंधरा दिवसांपासून रुग्णालयात रक्ताची मागणी वाढल्याने बहुतांश नागरीकांना वेळेत रक्तपुरवठा करता येत नाहीे, हे वास्तव आहे. रक्तपेढीत ठेवण्यात येणा-या रक्ताचे आयुष्य हे साधारणत: ४२ दिवस राहते. प्रसंगी रक्तपेढीत आवश्यक ब्लड गृ्रप उपलब्ध नसले की, नोंदी असलेल्या रक्तदात्यांना अशा वेळी बोलावून त्यांच्याकडून रक्तदान करवून घेतले जाते. मागणीनुसार रक्ताचा पुरवठा केला जात असल्याचे यावेळी सागण्यात आले.