नांदेड : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर आहेत. परभणीत भर पावसात त्यांनी सभा घेऊन भाजपवर निशाणा साधला. तर आज त्यांनी अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपला पुन्हा एकदा टार्गेट केले. उद्धव ठाकरे यांनी नांदेडचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेतली.
देशात हुकूमशाहीविरोधी लाट आली असून केंद्र सरकार घटना, संविधान बदलतील अशी भीती निर्माण झाली आहे, असे म्हणत महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असे ते म्हणाले.
तर दुसरीकडे शेतक-यांमध्ये सरकारविरोधात असंतोष असल्याचे ते यावेळी म्हणाले. मोदी सरकारने सातबारावरील शेतक-यांची नावे खोडून गद्दार सेनेचे नाव लिहिले. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही सणसणीत टीका केली. सुनेत्रा पवार यांना हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणातून क्लीन चिट मिळाली यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला वॉशिंग मशिनची जाहिरात असल्याचा दणदणीत टोला लगावला. तर पार्थ पवारांवरही त्यांनी यावेळी खडे बोल सुनावले. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होतो, इथे सर्वसामान्य आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर असताना मोदी गद्दारांना सुरक्षेचे कवत देत फिरत आहेत.
एकनाथ शिंदेंवर बोलण्यास नकार!
या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपावर प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, मी घटनाबा लोकांबद्दल बोलत नाही. त्यांना सकाळी जशी स्क्रिप्ट येते ते कण्हून कण्हून तसेच बोलतात.