शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेडलगत वाहत असलेली मांजरा नदी कोरडी ठाक पडली असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्यासह सिंंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगरगाव बॅरेज असले तरी डोंगरगाव ते धनेगाव बॅरेजमधील अंतर मोठे असल्याने मार्चमध्येच मांजरा पात्रात थांबलेले पाणी संपल्याने नदी कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे येणा-या काळात उजेड, बिबराळ, बाकली व राणी अंकुलगा भागात छोटे बंधारे बांधून पाणी टंचाई दुर करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतक-यातून केली जात आहे.
तालुक्यात मोठा किनारा लाभलेल्या मांजरा नदीत पावसाळ्यात थांबलेले पाणी मार्च अखेर संपत असल्याने मांजरा नदी काठच्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बागायती सिंंचनाचा प्रश्न निर्माण होत आहे. मार्चनंतर उजेड बिबराळ बाकली राणी अंकुलगा सह अन्य गावांना पाणी मिळायचे झाल्यास या परिसरात आणखी बॅरेजस उभारणे आवश्यक झाले आहेत. दरम्यान तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथे मांजरा नदीवर एकमेव बॅरेज उभारण्यात आले आहे. शेवटी देवणी तालुक्यातील धनेगाव येथे बॅरेज उभारण्यात आले आहे. पावसाळ्यात धनेगाव बॅरेज भरल्यानंतर उजेडपर्यंत मांजरा पात्रात पाणी थांबते मात्र धनेगाव ते डोंगरगाव हे अंतर अधिक असल्याने हे पाणी फार काळ थांबत नाही. परिणामी या परिसरातील ग्रामस्थांना मार्च अखेर पाणी टंचाईचा तर शेतक-यांंना सिंंचनाच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्याची व सिंंचनाची अडचण दुर करायची झाल्यास उजेड बिबराळ बाकली राणी अंकुलगा व बसपूर गावांलगत मांजरा पात्रावर आणखी छोटे छोटे बॅरेज उभारणे आवश्यक असून यांसाठी लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिका-यांंनी पाठपुरावा करणे आवश्यक असून या भागांत बॅरेज झाल्यास मांजरा काठ सुजलाम सुफलाम होवून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठी मदत होणार आहे.