उदगीर : बबन कांबळे
उदगीर तालुक्यातील हेर हे मोठे गाव आहे. हेर गावातील दहा हजार लोकसंख्येची तहान भागवायची कशी असा प्रश्न पडला आहे. हेर हे पूर्वीपासूनच पाणी टंचाई असलेले गाव आहे. पूर्वीच्या काळी हेर येथे मुलगी द्यायची म्हंटले तरी पाऊसपाणी कसे आहे याची मुलीच्या वडीलांकडून चौकशी केली जात असे. अशी या गावची आख्यायिका आहे.
गेली २५ वर्ष या हेर विधानसभा नावाने आमदार निवडून गेले मात्र एकाही आमदाराला या गावाची पाणी टंचाई दुर करण्यात यश आले नाही. मध्यतरीचा दोन-तीन वर्षांचा काळ सोडला तर आजही गावची ओळख पाणी टंचाई असलेले गाव अशीच आहे. दहा वर्षापूर्वी चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी साठवण तलावावरुन जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजने अंतर्गत सात खेडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु सातखेडी पाणीपुरवठा योजनेचा महावितरणच्या विजबिलापोट दोन-तीन वर्षातच बोजवारा उडाला. थकीत रकमेचा आकडा दीड कोटी गाठल्याने महावितरणने विद्युत पुरवठा खंडीत केला. यामुळे गेल्या सहा-सात वर्षापासून लाखो रुपये खर्च करुन कार्यान्वित केलेली योजना सहा ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी मातीत कुजत आहे. साठवण तलावात पाणीसाठा असताना व नळयोजना कार्यान्वित असतानाही केवळ राजकीय वरदस्ताच्या अभावामुळे हेरकरांना गेल्या सह-सात वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून निजामकालीन खोदलेल्या गावातील चार-पाच आडावर दहा हजार जनतेला आपली तहान भागवावे लागते.
दरवर्षी अर्ध्या गावची मदार शिवारातील पाण्यावर असते तेही यंदा शिवारात पाणी नाही.यामुळे येणारा काळ हेरकरांसाठी अधिक तीव्रतेचा ठरणारा आहे. दरम्यान हेरच्या सरपंच सारिका अविनाश सूर्यवंशी यांनी सातखेडी योजनेचा बोजवारा उडाल्याने पर्यायी पाण्याची व्यवस्था म्हणून हेर येथील जुन्या पाणीपुरवठा विहीरी वरुन नळयोजना कार्यान्वित केली होती. तेही आठ दिवसाआड एका वार्डाला पाणी पुरवठा केला जात होता. तेथील ही पाणीसाठा तळ गाठल्याने महिण्यात एकदा होणारा पाणी पुरवठाही बंद झाला आहे.
सध्या गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाई च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने पंचायत समिती कडे दोन टँकर मागणी प्रस्ताव, व अधीग्रहण प्रस्ताव पाठवुनही या प्रस्तावाची अघाप प्रशासनाने दखल घेतली नाही प्रशासनाने सदर प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी हेर ग्रामपंचायत अंतर्गत जंगमवाडी, बामाजीचीवाडी, जयाबायचीवाडी, नागोबाचीवाडी येथील नागरिक करित आहेत.