मुंबई : प्रतिनिधी
गेल्या ३ वर्षांत महाराष्ट्रातील २ प्रमुख राजकीय पक्षांत फूट पडली. त्यातील एक गट भाजपसोबत गेला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरश: चिखल झाला आहे. दरम्यान, पक्ष फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण राज्यात सहानुभूतीची लाट असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ठाकरे-पवारांना मिळणारी सहानुभूती लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, आता ठाकरे, पवारांना काऊंटर करण्यासाठी भाजपकडून ब्रम्हास्त्राचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील सभा वाढविण्यात आल्या आहेत.
भाजपकडून ४५ पारच्या घोषणा देण्यात येत असल्या तरी पूर्वी निवडून आलेल्या ४१ जागा राखण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची संख्या वाढली आहे. गुजरातचा विकास म्हणजेच देशाचा विकास असा दावा करणा-या पीएम मोदींनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जोर लावला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या जास्त जागा असणा-या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराला प्राधान्य दिले आहे.
राज्यात मोदींच्या सभांचा धडाका
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात मोदींच्या ५ सभा झाल्या. पुढील ४ दिवसांत मोदींच्या ७ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय दुस-या टप्प्यात नांदेड आणि परभणीत मोदींच्या सभा पार पडल्या. महाराष्ट्रात दुस-या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मोदींच्या सभा पार पडणार आहेत.
कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुण्यातही सभा
महाराष्ट्रातील दुस-या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर मोदींच्या सभांना पुन्हा एकदा सुरुवात होईल. सोलापूर, सातारा आणि पुणे मतदारसंघात २९ एप्रिल रोजी सभा पार पडणार आहे. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ २७ एप्रिल रोजी सभेचे आयोजन केले आहे. याशिवाय पुण्यात रोड शोचे आयोजनही करण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी पीएम मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरला सभा घेणार आहेत.
ठाकरे-पवारांना देणार प्रत्युत्तर
चौथ्या टप्प्यात अहमदनगर, जळगाव, औरंगाबादमध्ये पीएम मोदी सभा घेणार आहेत. अखेरच्या पाचव्या टप्प्यात मोदींचे टारगेट मुंबई असणार आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीची संयुक्त सभा होणार आहे तर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आतापर्यंत ५ जाहीर सभा झाल्या आहेत.