मुंबई : महाराष्ट्रातील शेतक-यांना आता दिवसा देखील वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीचे पंप सुरु ठेवण्यासाठीचा खटाटोप संपणार आहे. शेतक-यांना दिवसा थ्री फेज वीज मिळत नाही. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेताकडे जाताना बिबटे अन्य जनावरांकडून शेतक-यांवर हल्ला होण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. यामुळे दिवसाचा संपूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
आता सरकारने राज्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाचा देखील वीज पुरवठा पुरेशा क्षमतेने होणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना २.० सुरु करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हुडको सोबत करार करण्यात आला.
राज्यातील शेतक-यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ९००० मे. वॅटच्या कामाचे देकार पत्र जारी करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना २.० अंतर्गत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
२५ हजार रोजगार निर्मिती
राज्यात दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना २.० योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत ४० हजार कोटीची गुंतवणूक होऊन २५ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. तसेच साल २०२५ मध्ये ४०% कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार आहेत. १८ महिन्यात प्रकल्प पूर्ण करायचा आहे. पण सोबत काम केले तर १५ महिन्यात देखील काम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांना या योजनेत १.२५ लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे मिळणार आहे. उद्यापासून उर्वरित कृषि फिडर सौर ऊर्जेवर कसे येतील, याचे नियोजन सुरू करा, आता थांबू नका असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिका-यांना दिले आहेत. शेतक-यांना ८ लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा द्यायचे आहेत असे त्यांनी सांगितले.