सोलापूर- येथील भाजपच्या माजी नगरसेविका मेनका राठोड तसेच त्यांचे पती मंडल अधिकारी शिवराज राठोड यांनी अशोक कनीराम चव्हाण यांचे खंडणीसाठी अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणीच्या खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश आय.ए. शेख-नाझीर यांनी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी चव्हाण हे त्यांच्या घरी असताना रवी जाधव, दीपक राठोड, संजय पवार हे मोटारसायकलवरुन त्यांच्या घरी आले, त्यांनी फिर्यादीला मेनका राठोड यांनी बोलावल आहे, असे सांगून जबरदस्तीने मोटारसायकलीवर व पुढे स्कॉर्पिओमध्ये बसवून त्यांचे अपहरण करुन जबरदस्तीने त्यांना राठोड यांच्या घरात आणले. त्यावेळी मेनका राठोड यांनी स्टम्पने व शिवराज राठोड यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली, त्यावेळी इतर तीन इसमांनी फिर्यादीस पकडून ठेवले तसेच त्यावेळी शिवराज राठोड यांनी फिर्यादीस तू मार्केट कमिटी निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचा प्रचार केल्याने माझी पत्नी निवडणुकीमध्ये पडली व त्यात आमचे वीस लाख रुपये नुकसान झाले.
त्यामुळे तू आठ दिवसांत दहा लाख रुपये आणून दे नाही तर तुझ्या परिवारास खलास करतो अशी धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यामुळे एकूण ५ आरोपींविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींविरुध्द सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठविले होते. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा धरून कोर्टाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगावकर, अॅड. ए.एन. शेख व सरकारतर्फे अॅड. गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.