कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र हा शिव, शाहू आणि फुले यांच्या विचाराने मंतरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी वंचितांच्या बाजूने लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा समतेचा मार्ग स्वीकारून तळागाळातील माणसासाठी लढत राहिले. पण आता या महान व्यक्तींची नावं घेणारी माणसं आता कुठे आहेत? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी करत ‘आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गाववाडा अशी आहे,’ असा हल्लाबोल महाविकासआघाडीच्या उमेदवारांवर केला.
छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर देखील वाड्यांच्या विरोधात लढले होते. महायुतीच्या माध्यमातून हे वाडे उद्ध्वस्त होतील, महायुतीचा विजय या ठिकाणी नक्की होणार, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शाहू महाराज यांचे नाव न घेता हल्लाबोल चढवला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
२७ एप्रिलला कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. पुन्हा एकदा ही जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीमागे उभी राहील. ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडियामध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू आणि अलिबाबाचे साथीदार आहेत. पंतप्रधान मोदी हे भारतातील अठरापगड जातीला सोबत घेऊन जात आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या लुटारूंना महायुती मूठमाती देईल, असा विश्वास माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षासोबत आम्ही सर्व घटक पक्ष आहोत. आमचा लढा होता तो सर्वसामान्य माणसाला आणि शेतक-यांना न्याय देण्याचा. शेतक-यांच्या चेह-यावर सुख-संपन्नता आणि आनंद असला पाहिजे. आम्हाला काय मिळणार यापेक्षा शेतक-यांना काय देणार ही भूमिका महत्त्वाची आणि आमची आहे. गेल्या ७० वर्षांच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस आहेत, असा टोलाही खोत यांनी लगावला.
……