संभाजीनगर : तीनही ऋतूंचे वेळापत्रक बिघडले. कधी पावसाळा लांबतो तर कधी हिवाळा कमी होतो. यंदा थंडीचे दिवस कमी राहिले. पर्यायाने उन्ह तापायला लवकर सुरवात झाली. मार्चमध्येच तापमानात वाढ होत असल्याने मार्चच्या मध्यातच अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
फेब्रुवारीपासून उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली. म्हणजेच थंडीचे दिवस कमी झाले आणि ते दिवस उन्हाळ्यात रूपांतरित झाले. परिणामी, यंदा उन्हाळा दीर्घ आहे.
एकंदरीत पृथ्वीवरील पर्वत, पठारे, मैदाने, नद्या, समुद्रकिनारे, समुद्रतळ, समुद्राचे पृष्ठभागीय तापमान यामध्ये वैविध्य दिसून येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आज बदल दिसून येत आहे. यामुळे मानवी जीवन, आर्थिक क्रिया, भौतिक घटक, औद्योगिक आदी सर्वच घटकांवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी वृक्ष लागवड, माती संवर्धन, हवा संवर्धनाची आणि मानवी गरजांवर नियंत्रण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तापमान वाढीला हवेतील प्रदूषण सर्वाधिक हातभार लावत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी यांनी सांगितले, तापमानवाढ होण्यात औद्योगिक प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. प्रदूषणामुळे ओझोनचा थर विरळ होऊन त्यातून सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायलेट किरणे सरळ भूपृष्ठावर येतात. त्यातून प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवायला सुरवात होते. वाहनांतून निघणारा धूरही त्यास कारण आहे.
पाच वर्षांत पारा ९ वेळा चाळिशी पार
चिकलठाणा मौसम विज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी राजेशकुमार यांनी सांगितले, ‘‘गेल्या पाच वर्षांत २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगरचे तापमान सर्वाधिक होते. २०१९ मध्ये २९ मार्चला ४१.२ डिग्री सेल्सिअस, २८ एप्रिलला ४३.६, ३१ मे रोजी ४२.८ आणि २ जूनला ४३ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते.