35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीय‘बदसूरत’ पॅटर्न!

‘बदसूरत’ पॅटर्न!

‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिस-यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची अजेय जोडी मोदी-शहा यांच्या गृहराज्यातून या घोषणेच्या पूर्ततेचा एक ‘बदसूरत पॅटर्न’ भाजपने जन्माला घातला आहे. चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने आपल्या उमेदवाराविरुद्धच्या मतपत्रिकाच बाद करण्याचा प्रयोग दाखविला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेने तो फसला होता. कदाचित त्या प्रयोगातील चुकांपासून धडा घेत आता भाजपने सुधारित प्रयोग राबविण्याचे मनावर घेतल्याचे दिसते. त्यामुळे सुरत मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या बिनविरोध निवडीसाठी आता चक्क काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधी उमेदवारांना निवडणूक रिंगणातून ‘बाद’ करून टाकण्याचा ‘बदसूरत पॅटर्न’ भाजपने जन्माला घातला आहे.

खरं तर एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला तर त्याचे स्वागतच व्हायला पाहिजे. त्यातून त्या उमेदवाराचे मोठेपण व कार्यकर्तृत्व सिद्ध होते. देशात आजवर २८ खासदार व २९८ आमदार निवडणुकीत बिनविरोध निवडून गेले आहेत व त्याचे स्वागतही देशातील जनतेने केले आहे. चिनी आक्रमणानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनाही नाशिक मतदारसंघातून महाराष्ट्राने बिनविरोध निवडून दिले होते. मात्र, सुरतचा बिनविरोध निवडीचा ‘बदसूरत पॅटर्न’ हा निराळाच आहे. म्हणजे कागदोपत्री यात कुठलीही खोट नाही. मात्र, हा उमेदवार बिनविरोध निवडला जाताना जे अगम्य योगायोग एकाच वेळी घडले ते मात्र या पॅटर्नची ‘बदसूरती’ अधोरेखित करणारे आहेत आणि म्हणूनच त्यावर आता वाद रंगला आहे. अर्थात हा वाद राजकीय असल्याने त्यात आरोप-प्रत्यारोप व एकमेकांवर चिखलफेक हे सध्याच्या राजकीय शिरस्त्याप्रमाणे साहजिकच! त्यातून काही हाती लागणे अशक्यच! त्यामुळे हे वाद चिवडण्यात लोकशाही व्यवस्थेवर नितांत श्रद्धा ठेवणा-या मतदारांना काही स्वारस्य असण्याचे कारण नाहीच! मात्र, हे अघटित घडले कसे? हे समजावून घेण्यासाठी या सगळ्या घटनेचा बारकाईने अभ्यास करणे व त्यासाठी ही घटना सविस्तर समजून घेणे आवश्यक ठरते.

सुरत लोकसभा मतदारसंघातील काँगे्रसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्या अर्जावर ज्या चार सूचक, अनुमोदकांची नावे होती त्यापैकी तिघांना ते निवडणूक निर्णय अधिका-यासमोर हजर ठेवू शकले नाहीत. या तिघांच्या सह्या बनावट असल्याचा आक्षेप विरोधी उमेदवार म्हणजे भाजपचे मुकेश दलाल यांनी घेतला होता. त्यामुळे नियमाप्रमाणे निलेश कुंभानी यांनी आपल्या अनुमोदक व सूचकांना निवडणूक निर्णय अधिका-यासमोर हजर करून आक्षेप असत्य असल्याचे सिद्ध करायला हवे होते पण ते हे करू शकले नाहीत म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. भाजपने आपल्या अनुमोदक व सूचकांना फितुर केल्याचा आरोप कुंभानी यांनी केला आहे. तो सत्यही मानला तरी अर्ज बाद झाल्यावर काँग्रेसचा उमेदवारच रहस्यमयरीत्या गायब होणे, त्यांच्या चारही अनुमोदकांनी अर्जावरील स्वाक्षरी आपली असल्याचे नाकारणे अशा वेगवान घडामोडी घडल्या. बरं ज्यांच्यावर काँग्रेस उमेदवाराने फितूर झाल्याचा आरोप केला ते तिघे कोण तर पहिला काँग्रेस उमेदवाराचा मेव्हणा, दुसरा त्यांचा पुतण्या आणि तिसरा त्यांचा व्यवसायातील भागीदार! एवढ्यावर हे नाट्य संपत नाही.

पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज भरणा-या दुस-या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अगोदरच बाद होतो व हा निर्णय येण्यापूर्वी हा पर्यायी उमेदवार ‘नॉट रिचेबल’ झालेला असतो. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यावर खरं तर उर्वरित पक्षांच्या उमेदवारांना आपल्याला संधी मिळाल्याचे स्फुरण चढायला हवे. मात्र, घडले उलटेच! बहुजन समाज पक्षाचा उमेदवार मागच्या दाराने गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात येतो व अर्ज माघारी घेऊन मागच्याच दाराने गुपचूप निघून जातो. बहुधा बसपच्या उमेदवाराची प्रेरणा मिळाल्याने उर्वरित चार अपक्ष उमेदवारही आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन टाकतात आणि मग निवडणूक रिंगणात एकटाच उरल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडला गेल्याचे जाहीर होते! बिनविरोध निवडून आलेला हा उमेदवार मोदींच्या चरणी आपण ‘पहिले कमळ’अर्पण केल्याची प्रतिक्रिया देतो. आता एवढे सगळे नाट्यमय योगायोग एकाच वेळी घडले तर ते घडवले गेल्याचा आरोप होणारच व तो चुकीचाही नाही. मात्र, हा खेळ दडपशाहीने रंगविला गेला की सर्वसंमतीने हा प्रश्न घटनेनंतर उत्तरार्धात घडलेल्या घडामोडींनी निर्माण होतो.

त्याचे उत्तर मात्र देशातील जनतेला या गदारोळात मिळत नाही! अर्ज माघारीच्या दिवशी आठ उमेदवारांनी घेतलेली माघार हा लोकशाहीतील अफलातून योगायोग नाही काय? त्यामुळे सर्व गोष्टी लोकशाही प्रक्रियेनुसार झाल्याच्या भाजपच्या दाव्यावर कोण विश्वास ठेवेल? काँग्रेसचे उमेदवार भाजपवर आरोप करतात. मात्र, त्या आरोपांची तड लावून भाजपचा खेळ जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी रहस्यमरीत्या गायब होतात. मग हा प्रकार राज्यघटनेसमोरील संकट आहे हा विरोधकांचा आरोप पूर्णपणे सत्य असला तरी या संकटास कोण-कोण जबाबदार हा संशय मतदारांच्या मनात निर्माण होणे साहजिकच! ज्या गुजरातने मागच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या अजेय जोडीला ‘शतप्रतिशत’ समर्थन देताना राज्यातल्या सर्व जागा भाजपच्या ‘झोळी’त टाकल्या त्या गुजरातमध्ये भाजपने असा प्रयोग घडविण्याची गरज काय? हा ही प्रश्नच! ‘चारसौ पार’च्या घोषणेची पूर्तता करण्यासाठीचा भाजपच्या अजेय जोडीचा हा ‘बदसूरत पॅटर्न’ आहे काय? हा प्रश्न या घटनाक्रमाने मतदारांच्या मनात नक्कीच निर्माण झाला आहे.

भाजप जर घडले ते प्रक्रियेप्रमाणेच असा दावा करत असेल तर मग मतदारांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर देणे, शंका-कुशंकांचे निराकरण करण्यासाठी या घटनाक्रमाची तड लावून सत्य जनतेसमोर ठेवणे सत्ताधारी म्हणून भाजपचे कर्तव्यच! मात्र हे कर्तव्य भाजप पार पाडणार का? हा प्रश्नच! त्यामुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे नक्कीच ठरवता येणार नाहीत. या सगळ्या ‘बदसूरत पॅटर्न’ कडे मतदार नक्कीच संशयाने पाहतायत, हे नक्की. त्याचा लोकसभा निवडणूक निकालांवर काय परिणाम दिसेल याची चार जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तोवर मतदारांच्या मनातला संशय कायमच राहणार आहे व तो दूर करण्याचा प्रयत्न सध्याच्या राजकीय भोवतालात होण्याची शक्यता नाहीच, हे मात्र देशातल्या लोकशाही व्यवस्थेवर नितांत श्रद्धा ठेवणा-या मतदारांचे दुर्दैवच, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR