पालघर : राज्य सरकारने आनंदाचा शिधासोबत दिलेल्या साड्या निकृष्ट असल्याचा आरोप करत महिलांनी त्या परत केल्या आहेत. यासोबतच महिलांनी मोदींचे छायाचित्र असलेल्या पिशव्या देखील परत केल्या आहेत. साड्या देण्यापेक्षा आमच्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक द्या, अशी मागणी या महिलांनी तहसीलदारांकडे केली.
राज्य सरकारने आनंदाचा शिधाबरोबरच या वर्षी अंत्योदय योजनेतील महिलांना साडी भेट देण्याचा निर्णय घेतला; परंतु या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे राज्यभरात महिला आंदोलन करत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये महिलांनी शंभर साड्यांसह मोदी यांच्या नावाच्या पिशव्या परत करून वेगळे आंदोलन केले. राज्य सरकार महिलांना अपंग करत असल्याचा आरोप या महिलांनी केला.
साड्यांऐवजी शिक्षक देण्याची मागणी
जव्हार येथील आदिवासी बहुल भागात रोजगार हमी योजनेशिवाय नागरिकांचा विकास होईल, अशा प्रकारची कोणतीही योजना गेल्या दहा वर्षांत राबवली गेली नाही. या भागाचा विकास व्हावा, म्हणून अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे. मात्र, केंद्रासह राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना लालूच देत असल्याची तक्रार तालुक्यातील महिलांनी केली आहे. महिलांनी सरकारी योजनेतून मिळालेल्या साड्या जव्हार येथील तहसील कार्यालयात जमा केल्या. या वेळी शकुंतला भोईर म्हणाल्या, की वर्षभरात एखादी साडी देण्यापेक्षा आमची साडी आम्हीच घेऊ, असं काहीतरी राज्य, केंद्र सरकारने करणं अपेक्षित आहे. साड्या वाटप करणं आवश्यक नसून त्याऐवजी गावात शाळेला शिक्षक देण्याची गरज आहे.