जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये सलग सहा दिवसापासून वादळी वा-यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे तालुक्यातील रब्बी ज्वारी तसेच इतर फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी केली होती. जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकांचे तसेच उन्हाळी पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत . तालुक्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण असून दि ९ एप्रिलपासून जळकोट तालुक्यात दररोज संध्याकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे जमिनीवर पावसाळ्यामध्ये जशी हिरवळ उगवते तशी हिरवळ शेती शिवारामध्ये उगवली अहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतीची उन्हाळी कामेही ठप्प झाली आहेत.
यासोबतच या शेतक-यांंची ज्वारी काढणीला आली आहे, अशा शेतक-यांंच्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतक-यांच्या अन्य फळ पिकांचे तसेच भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . दि १४ एप्रिल रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला . तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत यांचा नुकसानीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल . अहवाल आल्यानंतरच किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर येईल, असे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी सांगितले. गत चार दिवसांपासून पडत असलेल्या वादळी वा-यासह पावसामुळे आमच्या शेतातील रब्बी ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी काढणीला आलेली ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी . शेतकरी नागनाथ धुळे यांनी केली आहे.