धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात शासकिय पंच उपलब्ध करून न दिल्याने सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बी. जी. आरवत यांच्यावर धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे दि. २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी शासकिय पंच घेण्याचे शासनाचे आदेश आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहर येथे दि. २५ मार्च रोजी दंगल झाली होती. जीवे मारण्याचा प्रयत्न व हिंदु-मुस्लीम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्ह्याचे घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करणेकामी दोन शासकीय पंच उपलबध् करुन देणे बाबत मुलत: असे कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे पत्र देवून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे बी.जी. आरवत यांनी शासकीय पंच पुरविले नाहीत. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व शासनाचे आदेश असताना सुध्दा यातील आरोपी बी. जी. आरवत यांनी शासकीय पंच पुरविले नाहीत व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करुन उल्लघंन केले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश उत्तमराव जाधव यांनी दि.२८ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे कलम १८८, १८७ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.