लातूर : प्रतिनिधी
संपूर्ण देशामध्ये लोकसभा २०२४ निवडणूक मतदान कार्यक्रम घोषित झाला असून त्याविषयी जाणीव जागृती कार्यक्रम सुरु आहेत. लातूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सन २००९ मध्ये ५४.९३ टक्के, २०१४ मध्ये ६२.६९ टक्के आणि २०१९ मध्ये ६३.०२ टक्के एवढी कमी होती. लोकसभा २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यापर्यन्त वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी ठरविले आहे. त्यादृष्टिकोनातून लातूर जिल्ह्यामध्ये स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. त्यामुळे लातूर लोकसभा मतदानाचा टक्का वाढून या विषयीचा लातूर पॅटर्न निर्माण व्हावा असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उपकेंद्र लातूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिल जायभाये यांनी केले.
भारत निवडणूक आयोग, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूरद्वारा स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, डॉ. बाळासाहेब गोडबोले, उपप्राचार्य प्रा. संजय पवार आणि रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. अनिल जायभाये म्हणाले की, मतदान जनजागृती करून लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी ७ मे रोजी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावावा व त्याकडे आपण आपले नैतिक कर्तव्य म्हणून बघावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वीप अंतर्गत एकूण दहा उपक्रम राबविण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सक्रिय सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी ७ मे रोजी आपल्या आई-वडिलांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याविषयी आग्रह धरावा असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, प्रा. जयश्री पाटील, प्रा. संपदा लखादिवे, शेख हिरा, प्रा. नेहा कांबळे, संशोधक विद्यार्थी जग्गनाथ कदम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगनाथ लांडगे, अजय गायकवाड, अशोक शिंदे, अनिल कोळ्ळे, नरेश वाडकर आणि जग्गनाथ येचेवाड यांनी परिश्रम घेतले.