लातूर : प्रतिनिधी
व्यापा-यांकडील हमालांच्या हमाली दर वाढीसाठी सोमवारी बोलावलेल्या बैठकीत मागण्याच्या संदर्भाने चार दिवसाचा वेळ द्यावा, अशी मागणी हमाल संघटनांच्याकडे करण्यात आली होती. त्यास हमाल संघटनांनी नकार दिल्याने सोमवारची बैठकही निष्फळ ठरली. हमाल संघटनांनी सोमवारीही कामबंद कायम ठेवल्याने शेतमालाचा सौदा न निघालयाने आडत बाजार पेठ बंद राहिली. यामुळे आडत बाजार पेठेतील कोटयावधी रूपयांची उलाढाल ठप्प राहिली.
महागाईनुसार हमालांच्या हमाली दरात वाढ करावी, या मागणीसाठी हमाल मापाडी गाडीवान संघटना, लोकसेवा माथाडी संघटना व महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने शनिवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हमाल संघटना व खरेदीदार व्यापारी यांच्याकडील हमाली दरवाढीचा विषय मार्गी लावण्यासाठी लातूर बाजार समितीने सोमवारी बैठक घेतली. या बैठकीस बाजार समितीचे पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कांही व्यापारी बैठकीला नसल्याने त्यांच्याशी चर्चा करून विषय मार्गी लावगण्यासाठी हमाल संघटनांच्याकडे चार दिवसाचा वेळ मागीतला. मात्र हमाल संघटनांनी नाराजी व्यक्त करत काम बंद आंदोलनावर ठाम राहिल्याने सदर बैठक निष्फळ ठरली.
आडत बाजार पेठेत सध्या रब्बी व खरीप हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन या शेतमालाची आवक होत असताना हमाल संघटनांनी हमालीच्या दरवाढीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन हंगामात आंदोलन सुरू झाल्याने सोमवारीही आडत बाजारात शेतमालाचा सौदा निघाला नाही. त्यामुळे लग्न सराई व सणासुदीच्या दिवसात शेतक-यांची मात्र आडचण झाली आहे.