लातूर : योगीराज पिसाळ
शेतीकडे जाणारे आरूंद पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी व शेतरस्त्यांचा कायापालट करण्यासाठी शासनाने मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते योजना सुरू केली. रोहयोतंर्गत ९०२ शेत पाणंद, रस्त्यांना कार्यरंभ आदेश देवूनही अद्याप ३५६ रस्ते सुरूच झाले नाहीत. मंजूर असलेले शेत, पाणंद रस्ते सुरू न करण्यामागे ग्रामपंचायतींची उदासिनता दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हयातील पाणंद रस्ते, शेत रस्त्यांचा अनेक कारणास्तव काया पालट न झाल्याने त्याच रस्त्यावरून शेतीकडे ये-जा करावी लागत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसलेली आहे. मी समृध्द गाव समृध्द, गाच समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द या संकल्पनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्त्यांचा कायापालट होत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाकडे १ हजार ९७६ कि. मी. अंतर असलेले १ हजार ३०८ रस्ते मंजूरीसाठी आले होते. त्यापैकी ९११ रस्ते कामांना तांत्रीक मान्यता मिळाली होती. ९०३ कामांना प्रशासकीय मान्यता, तर ९०२ कामे सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ४९० कामे सुरू झाली. तर मंजूर २५६ कामे अद्याप सुरू झाली नाहीत. उन्हाळयाच्या दिवसात कामे मार्गी लावण्यासाठी पोषण वातावरण असताना ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे सदर कामे रखडली असून या कामांना मुहुर्त केंव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.