राहुरी : नगर जिल्ह्यात विखेंच्या पिढ्यांनी मागील ५० वर्षांत काय काम केले, जिरायत भागाला वरदान ठरणा-या निळवंडे प्रकल्पाच्या बाजूने दत्ता देशमुख यांनी भूमिका मांडली. त्याला विखेंनी विरोध केला. आता सत्ता हातात आल्यावर निळवंडेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
राहुरी कारखाना बंद पाडला. सहकारातील संस्था बंद पाडून खासगी शिक्षण संस्था काढल्या असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. राहुरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण तनपुरे, राजू आघाव, सुरेश वाबळे, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भिटे, अरुण कडू, अमृत धुमाळ, योगिता राजळे, शशिकांत गाडे आदी होते. आमदार लंके म्हणाले, की त्यांना विकासाच्या गप्पा करण्याचा अधिकार नाही. विखेंच्या प्रवरा कारखान्यावर ८५० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यांनी गणेश, राहुरी कारखाना, मुळा प्रवरा वीज संस्था, छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पाडले. मतदारांनी माझ्यावर एकदा विश्वास ठेवावा. किरण कडू यांनी आभार मानले. या वेळी तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.