सोलापूर : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्ज केल्यापासून मतमोजणी होईपर्यंत (१२ एप्रिल ते ७ मेपर्यंत) प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांच्याच खर्चाची मर्यादा असणार आहे.
निवडणूक काळात उमेदवाराला दररोजचा झालेला खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्या दिवशी सादर करावा लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे, पण सोलापूर लोकसभेसाठी भाजप व काँग्रेसचा उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपने पुन्हा एकदा मैदानात उतरविले आहे. पण, मोहिते-पाटलांची नाराजी अजून संपलेली नाही. दुसरीकडे या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही अंतिम झालेला नाही. तरीदेखील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी सुरू केली असून उर्वरित पथके जिल्हाभर फिरत आहेत.
प्रशासनाकडून निवडणूक प्रचार काळातील व्हिडिओ शूटिंगसाठी २१८ जणांची नेमणूक केली आहे. तसेच स्वतंत्र ६१ पथके देखील नेमली आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून होणाऱ्या सभा, सार्वजनिक कार्यक्रम व उपक्रमातील खर्चावर प्रशासनाचा कटाक्ष राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी १२ एप्रिलपासून १९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर अर्ज भरल्यापासून २२ एप्रिल ते ७ मे अशा १६ दिवसांत उमेदवारांना प्रचार करण्यास वेळ आहे. पण, मतमोजणीसाठी तब्बल २८ दिवस वाट पाहावी लागणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ७२ तासांत प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांचे पोस्टर, बॅनर, डिजिटल स्वत:हून काढून घेणे किंवा झाकून ठेवणे बंधनकारक आहे. ज्याठिकाणी असे राजकीय पोस्टर, डिजिटल दिसतील ते प्रशासनाच्या वतीने काढले जाणार आहेत. दरम्यान, आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी करण्यासाठी नागरिकांना उ-५ॅ्र’ ॲप देण्यात आले आहे. त्यावर कोणीही तक्रार करू शकतो. सध्या जिल्हा प्रशासनाकडे बॅनर न काढल्याच्या पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची माहिती आम्हाला सादर करावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती, पथके नेमली आहेत. दररोजच्या खर्चाचा हिशोब दुसऱ्या दिवशी देणे अपेक्षित आहे.असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगीतले.