शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शेतक-यांवर निसर्गाचे दुष्टचक्र कायम असून गेली तीन दिवसांपासून झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळीने वीस हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवरील फळबागा बाधित झाल्या असून झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. शिरूर अनंतपाळ शहरासह साकोळ, तिपराळ, कानेगाव, शेंद, दैठणा, येरोळ, तळेगाव, हिप्पळगाव, हालकी, उजेड, बिबराळ, राणी अंकुलगा, घुगी सांगवीसह अनेक गावातील शेतक-यांंनी लागवड केलेल्या फळबागा फळांनी चांगल्या बहरले असताना या अवकाळीने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या अवकाळीने उन्हाळी पिकांसह भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर या वादळी वा-याच्या फटक्याने फळबागामध्ये अक्षरश: कै-यांचा सडा पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. दरम्यान कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी एल एम खताळ, कृषी मंडळ अधिकारी बी. एम. राजवाडे, कृषी सहाय्यक धर्मेंद्र क्षीररसागर यांनी बाधित फळबागांचा पंचनामा केला आहे.