लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात शनिवार दि. २० एप्रिल रोजी वादळीवा-यासह झालेल्या बेमोसमी पावसाचा ३५० हेक्टर शेती क्षेत्राला फटका बसला आहे. यात फळबागा, भाजीपाल्याचे मोठे नूकसान झाले आहे. तसेच ठिकठिकाणी विजा पडून मोठे नूकसान झाले आहे. यात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. १९ गावे बाधित झाली आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आ.े त्यात शनिवारी मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत बेमोसमी पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी वादळीवा-यासह पाऊस झाला. यात फळबागा तसेच भाजीपाल्याच्या क्षेत्राचे मोठे नूकसान झाले आहे. सध्या अंबा बहरात आहे. पण वादळीवारे सुटल्याने ठिकठिकाणी आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानूसार जिल्ह्यात ३५० हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यात प्रामुख्याने रेणापूर तालुक्यात १५१ हेक्टर, निलंगा ४५ हेक्टर, शिरुर अनंतपाळ तालुक्यात २३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नूकसान झाले आहे. या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी विजाही पडल्या आहेत. यात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. बेमोसमी पावसामुळे झालेल्या नूकसानीची पाहणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.