लातूर : प्रतिनिधी
जमाअत-ए-इस्लामी हिंद, लातूर यांनी सस्नेह ईद मिलन समारोह आयोजित केला होता. सदर आयोजनाचा उद्देश सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता, आपुलकी, प्रेम, बंधुभाव व सहिष्णुता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सर्वधर्मीय देश बांधवांसोबत ईदचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वीप, लातूर अंतर्गत मतदार जनजागृती व मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच सर्वांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन डॉ. अनिल जायभाये यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअत-ए-इस्लामी हिंद दिल्लीचे सल्लागार सदस्य तौफीक असलम खान होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत प्रा. सुभाष भिंगे, महाराष्ट्र खाजगी मुख्याध्यापक मंडळ लातूरचे कार्याध्यक्ष इस्माईल शेख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉ. अनिल जायभाये, स्तंभ लेखक एम. आय. शेख उपस्थित होते.
आज देशामध्ये केवळ आपल्याला पाहिजे तशी राजकीय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, या एकच ईर्षेमुळे देशातील सामाजिक वातावरणात उलथापालथ झालेली दिसून येत आहे. राजकीय नेतृत्वांनी आपल्या राजकीय ईच्छेपोटी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केले आहे. एकमेकांविषयी असलेली सद्भावना संपत चालली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराने देशाची सत्ता मिळाल्यानंतर संविधानच बदलण्याची भाषा बोलली जात आहे. सामाजिक क्षेत्रावर राजकीय क्षेत्राचे वर्चस्व निर्माण झाल्याने नागरिकांच्या मुलभूत समस्या जशाच्या तशा असून इतर समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे समस्त भारतीय नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत १०० टक्के मतदान करुन सामाजिक स्वास्थ्य निट राहावे, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी सर्वच पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त्त केले. कार्यक्रमानंतर शिरखूरम्याचा आस्वाद घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मुहंमद आरेफ, मुहंमद यूनुस पटेल यांनी या परिश्रम घेतले. कार्यक्रमास जमाअत-ए-इस्लामी हिंद लातूरचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.