लातूर : प्रतिनिधी
व्यापा-यांकडील हमालांच्या हमाली दर वाढीसाठी लातूर बाजार समितीने शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीला एकही खरेदीदार व्यापारी उपस्थित न राहिल्याने हमालीच्या संदर्भाने तोडगा निघाला नाही. महागाईनुसार हमालांच्या हमाली दरात वाढ करावी, या मागणीसाठी हमाल मापाडी गाडीवान संघटना, लोकसेवा माथाडी संघटना व महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने शनिवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी शेतमालाचा सौदा न निघालयाने आडत बाजारातील कोटयावधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
रब्बी व खरीप हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन या शेतमालाची आडत बाजारात मोठया प्रमाणात आवक होत आहे. तसेच शेतमालाच्या दरात वाढ होताना असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना आडतीवर काम करणा-या कामगारांच्या मजूरीच्या दरात महागाईनुसार २०२० साली वाढ होणे आवश्यक असताना कामगारांच्या मजूरीच्या दरात वाढ झाली नाही. प्रशासक काळात धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने हा विषय रखडला. मजूरीत वाढ करावी म्हणून दि. २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, हमाल मापाडी गाडीवान संघटना, लोकसेवा माथाडी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. लातूर बाजार समितीने १५ दिवसात यावर समन्वयाने तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने आडत बाजारातील व्यवहार सुरू झाले होते. मात्र आश्वासन देऊन ४० दिवस झाले तरी हमालांच्या हमाली दरवाढीचा विषय मार्गी न लागल्याने पुन्हा शनिवार पासून हमालांनी काम बंदचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे शनिवार आडत बाजारात शेतमालाचा सौदा न निघाल्याने कोटयावधी रूपयांचे व्यवहार ठप्प राहिले.
हमाल संघटना व खरेदीदार व्यापारी यांच्याकडील हमाली दरवाढीचा विषय मार्गी लावण्यासाठी लातूर बाजार समितीने शुक्रवारी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला लातूर बाजार समितीचे पदाधिकारी व हमाल संघटनेचे पदाधिकारी यांच्या शिवाय एकही व्यापारी या बैठकीला उपस्थित न राहिल्याने या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे हमाल संघटनांनी शनिवारपासून काम बंदची हाक दिल्याने शनिवारी आडत बाजारात शेतमालाचा सौदा निघाला नाही. त्यामुळे लग्न सराई व सणासुदीच्या दिवसात शेतक-यांची मात्र आडचण झाली आहे.