लातूर : प्रतिनिधी
चैत्रा मध्ये उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सीअस पर्यंंत पोहचला आहे. वाढत्या तापमानाच्या बरोबरच टंचाईच्या झळा वाढू झाल्या आहेत. सध्या वाढत उन्हामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हयातील ४८३ गावे व वाडयांना पाणी टंचाई जाणवत असून ग्रामीण भागातील वाढती पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाने आलेल्या प्रस्तावांची पाहणी करून जिल्हयातील १८४ गावे व वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवणा-या ग्रामपंचायतींनी ३०१ गावे, ५१ वाडया यांनी ४८३ अधिग्रहणाद्वारे गावातील नागरीकांना पाणी मिळावे म्हणून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे करण्यात आले होते. सदर प्रस्तावांची पाहणी करून तहसिल कार्यालयाकडे २१५ गावे व ३९ वाडयांना ३२५ अधिग्रहणाची गरज असल्याचे कळवण्यात आले होते. त्यानुसार तहसिल कार्यालयांनी १३८ गावे, ३० वाडयांना १८४ अधिग्रहण मंजूर केले आहेत. या मंजूर अधिग्रहणाद्वारे ग्रामीण भागातील नागरीकांची तहाण भागवण्यात येत आहे.
जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी जिल्हयात जानेवारीपासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. चैत्राच्या वाढत्या उन्हामुळे नद्या, नाले, विहिरी कोरडया पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. ग्रामीण भागात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.