नवी दिल्ली : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काय केले, असा प्रश्न विरोधक विचारत आहे. याला उत्तर देण्यासाठी ‘काँग्रेस के ७० साल बेमिसाल’ असे प्रचार गीत तयार केले असून ते व्हायरल होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने सदरील प्रचार गीतावर आक्षेप घेतला असून ते प्रचार मोहीमेत वापरण्यात येवू नये अशी सूचना केली आहे, तथापि या आदेशास कॉँग्रेस पक्षातर्फे न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
काँग्रेसने ७० वर्षे देश चालविला असून देशाला मजबूत बनविले आहे, अशा आशयाचे हे गीत आहे. हिंदी चित्रपटातील गाजलेले गीत ‘संदेशे आते है’च्या चालीवर हे गीत तयार करण्यात आले आहे. काँग्रेसने आयआयटी संस्था निर्माण केल्या, शिक्षणाचा अधिकार दिला. देश अखंडित ठेवला, हरित क्रांती केली, असा उल्लेख या गीतात करण्यात आला आहे.
भाजपसह अनेक विरोधी पक्षांचे नेते सातत्याने काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असा सवाल करीत असताना काँग्रेसने ७० वर्षांचा आलेख या जवळपास दीड मिनिटांच्या गीतामध्ये साकारला आहे. विशेष म्हणजे या गीताच्या चित्रफितीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना अधिक वेळा दाखविण्यात आले.