जळकोट : प्रतिनिधी
लातूरसह देशातील जनता या लोकसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत आहे. भाजपने दहा वर्षांपूर्वी सांगितले होते, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतीमालाला भाव देऊ, पिक विमा देऊ, नोकरी देऊ, महागाई कमी करु, अशी अनेक आश्वासनेही त्यांनी दिली, पण त्याची पूर्तता त्यांनी केली नाही, आता या निवडणूकीत सत्ताधारयांना जाब विचारावा लागेल, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २३ एप्रिल रोजी सकाळी जळकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक रवींद्र काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जळकोट नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मनमथआप्पा किडे, जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेटे, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, संतोष तिडके, बाबुराव जाधव, आशिष पाटील, मुक्त्तेश्वर निवरे सिद्धेश्वर पाटील, बालाजी काळे, गणपतराव धुळशेटे, सुपर्ण जगताप, व्यंकटराव केंद्रे, धोंडीराम पाटील, बसवराज काळे, नितीन धूळशेटे आदींसह, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाची सुरुवात हिंदू-हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले, दीप प्रज्वलन केले.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी उदगीर व जळकोटवर प्रेम केले
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, जनता या लोकसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत आहे. जळकोट हा दुर्गम भाग आहे, या तालुक्याला लोकनेते विलासराव देशमुख यांनी भरपूर प्रेम केले उदगीरवरही प्रेम केले. उदगीर जळकोटच्या उसाचा प्रश्न काँग्रेस पक्षाने सोडवला, लोकनेते विलासराव देशमुख यांनी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला, म्हणून प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला बँकेने जेव्हा त्याचा लिलाव काढला तेव्हा, तो मांजरा परिवारात सामील करुन घेतला. सर्वाधिक विदर्भ मराठवाड्यातील भाव शेतक-यांना या कारखान्याने दिला. भाजपने दहा वर्षांपूर्वी सांगितले होते, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करु शेतीमालाला भाव देऊ पिक विमा देऊ नोकरी देऊ, महागाई कमी करु असे अनेक आश्वासनही त्यांनी दिली पण त्याची पूर्तता त्यांनी केली नाही असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगेना राज्यातील महायुती सरकारने फसवले
पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज शेतक-यांना दिले. शेतक-यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून प्रगती केली पाहिजे. या परिसरात बराच लोकनेते विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून झाले. या देशांमध्ये भवितव्य घडवणा-या या लोकसभेच्या निवडणुका आहेत. मनोज जरांगेना राज्यातील महायुती सरकारने फसवले, ही जनता या सरकारला धडा शिकवेल. आरक्षणाचा बाजार मांडून समाजातील बंधुभाव संपत चालला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सही करून जनतेला काँग्रेस गॅरंटी कार्ड दिले आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर या देशात हे गॅरंटी लागू केल्या जातील, हे आश्वासन नाही वचन आहे. कारण या गॅरंटी कर्नाटक, तेलंगणात लागू झालेले आहेत असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात महाविकास आघाडीची हवा आहे, असे सांगून त्यांनी येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
महिन्याला एकदा तालुक्यात येऊन मी जनता दरबार घेईन
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, जळकोट तालुक्याच्या प्रश्नांची मला जाण आहे, मागच्या दहा वर्षात निवडून आलेल्या भाजप खासदारांनी प्रामाणिकपणे काम केले नाही. म्हणून जनतेला खूप अडचणी आल्या मला निवडून दिल्यावर महिन्याला एकदा तालुक्यात येऊन मी जनता दरबार घेईन हा भाग डोंगराळ आहे, येथे सिंचनाच्या सोयी सुविधा करु येथील शेतक-यांचे नुकसान झाले, पण सरकारने त्यांना मदत केली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला पण भाजप हे संविधान आता बदलणार आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल, सौर ऊर्जेसाठी प्रकल्प या तालुक्यात उभारण्यात येईल ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे सांगून येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जळकोट नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष मनमथआपा किडे म्हणाले की, भाजपने खूप स्वप्ने जनतेला दाखवली, खोटी आश्वासने दिली. परदेशातील काळा पैसा भारतात आणू, प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देऊ, शेतीमालाला भाव देऊ असे ते म्हणाले. त्यांनी सर्वांचा भ्रमनिरास केला. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज केला. भाजप भ्रष्टाचारांचा गुंडगिरी वाल्यांचा आता पक्ष बनला आहे, इलेट्रोल बॉण्डच्या माध्यमातून त्यांनी जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला आहे. मणिपूरमध्ये महिला वर अत्याचार करण्यात आले, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही गेले नाहीत अशी सडकून टीका करुन त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आशिष पाटील यांनी केले तर शेवटी आभार जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे यांनी मानले.