करमाळा: ग्रामीण भागातील आठवडा बाजारात ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढणारी उष्णता यामुळे पालेभाज्यांची आवक घटली असली तरीही वाढ झाली नाही. सर्वत्र पाणी पातळी घटली असली व भूगर्भातील पाणी पातळी खोलवर लवर गेली गेली असली तरी भाजीपाला पिकांना मात्र वारंवार पाणी लागते त्यातच वाढत्या तापमानाचा पिकांच्या वाढीवरही परिणाम होत आहे. भाजीपाला बाजारात सध्या कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, कोथिंबिरीची एक पेंडी दोन रुपये नगाप्रमाणे मिळत आहे.
बाजारात हिरव्या मिरचीचे भाव मात्र तिखट आहेत. हिरवी मिरची १०० ते १२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. मेधी २० रुपये पेंडी, पालक १० रुपये, वांगी १० ते १५ रुपये, भेंडी ४० ते ५० रुपये, दोडका ४० रुपये,
शेवगा ५० रुपये, गवार ५० ते ६० रुपये, बटाटा ३० रुपये, कांदा १० ते १५ रुपये, फ्लॉवर २५ ते ३० रुपये, कोबी २५ ते ३० रुपये, काकडी २० ते ३० रुपये, कारले २० ते २५ रुपये, शिमला मिरची ६० ते ७० रुपये तर टोमॅटो १२ ते १५ रुपये, लिंबू ५ ते ७ रुपये नग या दराने विकला जात आहे. भाजीपाल्याचे दर अवाक्यात असतानाच डाळीचे दर मात्र वरचेवर वाढत असून, सर्वच डाळीने शंभरी पार केली आहे. तूर डाळीने तर उच्चांक स्थापित केला असून, ती सध्या १८० रुपये किलोवर गेली आहे.
दुष्काळी परिस्थिती व पाण्याची उपलब्धता पाहून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेतली. परंतु, त्यांना सध्या तरी योग्य दर मिळत नाही अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना आला की काय? अशी परिस्थिती झाली आहे.