सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने वादळात दिवा लावला असून, दुष्काळी परिस्थितीमुळे सक्तीच्या कर्ज वसुलीला बॅन असताना मार्चपर्यंत ३४.३७ टक्के वसुली केली आहे. दरम्यान, बँक शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या एकरकमी परतफेड (ओटीएस) योजनेला जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने वसुलीत चांगली वाढ होईल, असे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बिगरशेती कर्जाच्या थकबाकीमुळे जशी आर्थिक अडचण झाली आहे तशी शेती कर्जाची वाढणारी थकबाकी डोकेदुखी ठरत आहे. बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी सोलापूर सहकार न्यायालय, पुणे, मुंबई न्यायालयात बँक आर्थिक भार सहन करीत आले. १०-१२ वर्षांपासून बिगरशेती कर्जवसुलीसाठी बँक झगडत असताना बँकेच्या १८ युनिटकडे ११०४ कोटींहून अधिक थकबाकी मार्च, दि. २३ पर्यंतची आहे. मागील वर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा फारच कमी पडला. यामुळे खरीप रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. शेती पिकांना पाणी मिळाले नसल्याने उत्पादकता कमी झाली. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने बँकांनी पीककर्ज सक्तीने वसूल करू नये, असे आदेश राज्य शासनाकडून काढले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने अशातही ३४.३७ टक्के वसूल केला आहे. सक्तीने नाही तरप्रेमाने वसूल केल्याचे बँकेचे मत आहे. तत्कालीन प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी बिगर शेती व शेती कर्जवसलीसाठी एकरकमी परतफेड (ओटीएस) योजना जाहीर केली. शेती कर्ज भरण्यासाठी काही रक्कम सवलत मिळत असल्याने २०२२ मध्ये जाहीर केलेल्या ओटीएस योजनेत चांगला वसूल झाला. शेतकऱ्यांना व्याजात चार पैसे सवलत मिळत असल्याने ओटीएस योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आहे आताही येत्या जून महिन्यांपासून ओटीएस योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च २०२४ पर्यंत बँकेने ३४.३७ टक्के इतकी वसुली झाली. त्यात जूनपर्यंत आणखीन भर पडत आहे.
नियमित कर्ज घेणारे व वेळेत भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. एप्रिल ते जून या कालावधीची वसुली होणार आहे. याशिवाय ओटीएस योजनेत सहभागी होऊन थकबाकीत सूट घेणारे शेतकरी आहेतच. शेतकऱ्यांन ओटीएस योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे.असे डीसीसी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी सांगीतले