उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यात चौदा साठवण तलाव असून यातील दोन मध्यम प्रकल्पात मुकबल पाणीसाठा असून बाकीचे साठवण व पाझर तलाव जोत्याखाली असल्याने आगामी काळात तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचे चटके बसणार असल्याचे तलावातील पाणीसाठ्याच्या आकडेवारुन दिसून येत आहे. तालुक्यात यावर्षी केवळ पन्नास टक्के पाऊस झाल्यामुळे पाणीपातळीत वाढ दिसून येत नाही. उदगीर उपविभाग अंतर्गत १४ साठवण तलाव असून काही दिवसात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद होणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाई भिती आतापासून वाटू लागली आहे.
उदगीर उपविभाग अंतर्गत ४६ तलावे असून २० हस्तांतरण केलेले आहेत. तीन सिंंचन डोंगर शेळके, जानापूर, आवलकोंडा, तर गावतलावाची संख्या ४२ कोल्हापुरी पाटबंधारे ५० असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते.भोपणी मध्यम, बनशेळकी मध्यम प्रकल्प साठवण तलावातून उदगीर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नियोजन करुन पाणीपुरवठा झाल्यास आगामी काळात पाणीटंचाई भासणार नाही. तालुक्यातील अनेक गावाचा पाणीपुरवठा साठवण तलावातून असून अनेक साठवण तलावाचे आता बुड दिसत असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. पुढील पाऊसकाळ येण्यास अजूनही ३ महिने बाकी आहे. त्यामुळे सध्या साठवण असलेले उपलब्ध पाणी ३ महिने नियोजनपुर्ण वापरणे गरजेचे आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर आतापासून नियंत्रण ठेऊन वापर करणे गरजेचे आहे.