31.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषमहती देवाधिदेवाची

महती देवाधिदेवाची

फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्री आदिदेव भगवान शिव कोट्यवधी सूर्यांच्या तेजाइतक्या महातेजस्वी लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले, असा उल्लेख ईशान-संहितेत आहे. शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेतील कथेनुसार, शंकराच्या निष्कल म्हणजे निराकार स्वरूपाचे प्रतीक असणारे लिंग याच पवित्र तिथीला प्रकटले आणि सर्वप्रथम ब्रह्मा आणि विष्णू यांनी त्याची पूजा केली होती. त्यामुळेच ही तिथी शिवरात्र या नावाने प्रसिद्ध झाली. जो भक्त महाशिवरात्रीला उपवास करून, इंद्रियांवर विजय मिळवून पूर्ण शक्ती आणि सामर्थ्यानिशी निश्चल भावनेने शंकराची पूजा करतो, त्याला संपूर्ण वर्षभर शिवपूजा केल्याचे फळ एकट्या महाशिवरात्रीच्या पूजेने मिळते, अशी मान्यता आहे.

फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. तसे पाहायला गेल्यास हिंदू धर्मग्रंथांमधील उल्लेखांनुसार, भगवान शंकराला प्रत्येक महिन्याची चतुर्दशी प्रिय आहे. परंतु संपूर्ण वर्षभरात फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी शंकराला अतिप्रिय आहे, असे मानले जाते. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे तीन गुण मानले गेले असून, त्यातील तमोगुणाचा प्रभाव दिवसापेक्षा रात्री अधिक असतो, अशी धारणा आहे. भगवान शंकराने आपल्या लिंगाच्या प्रादुर्भावासाठी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्रीची निवड केली होती, हे त्यामागील कारण सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या पर्वाचे महत्त्व सर्व पुराणांमध्ये सांगितले आहे. गरुडपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण, शिवपुराण तसेच अग्निपुराणातही शिवरात्रीच्या पर्वाचा महिमा वर्णन केला आहे. शिवरात्रीच्या संदर्भात केवळ एकच कथा नसून अनेक कथा सांगितल्या जातात. परंतु सर्व कथांचे स्वरूप आणि वर्णनशैली एकसमान आढळते. या पर्वाचे महत्त्व एकसारखेच सांगितले गेले आहे. या दिवशी उपवास केला जातो. तसेच शिवमहिम्याचे गुणगान केले जाते. बेलाची पाने अर्पण करून भगवान शंकराची पूजाअर्चा केली जाते. प्राचीन ग्रंथांनुसार, या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जेव्हा सत्य आणि असत्यही नव्हते, तेव्हा केवळ भगवान शिव होते.

महाशिवरात्र हे शिव आणि शक्तीच्या मिलनाचे महापर्व आहे. फाल्गुनमासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्री आदिदेव भगवान शिव कोट्यवधी सूर्यांच्या तेजाइतक्या महातेजस्वी लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले, असा उल्लेख ईशान-संहितेत आहे. शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेतील कथेनुसार, शंकराच्या निष्कल म्हणजे निराकार स्वरूपाचे प्रतीक असणारे लिंग याच पवित्र तिथीला प्रकटले आणि सर्वप्रथम ब्रह्मा आणि विष्णू यांनी त्याची पूजा केली होती. त्यामुळेच ही तिथी शिवरात्र या नावाने प्रसिद्ध झाली. जो भक्त महाशिवरात्रीला उपवास करून, इंद्रियांवर विजय मिळवून पूर्ण शक्ती आणि सामर्थ्यानिशी निश्चल भावनेने भगवान शंकराची पूजा करतो, त्याला संपूर्ण वर्षभर शिवपूजा केल्याचे फळ एकट्या महाशिवरात्रीच्या पूजेने मिळते, अशी मान्यता आहे. शिवपुराणाच्या कोटिरुद्रसंहितेत शिवरात्रीच्या व्रताचा विधी आणि महिमा वर्णन केला आहे. शंकराच्या आराधनेसाठी केल्या जाणा-या सर्व व्रतवैकल्यांमध्ये महाशिवरात्रीचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. भोग आणि मोक्षाची कामना करणा-या प्रत्येकाने हे व्रत आचरले पाहिजे, असे सांगितले गेले आहे. देवाधिदेव महादेवाला कायम प्रसन्न राखू इच्छिणा-या प्रत्येकाने हे व्रत करायला हवे, असे म्हटले आहे.

स्कंदपुराणात या महाव्रताची महती वर्णन करताना म्हटले आहे की, हे शिवरात्रीचे व्रत परात्पर आहे. म्हणजेच, यासारखे दुसरे अन्य व्रत असू शकत नाही. स्कंदपुराणाच्या नागरखंडात ऋषींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सूतजी म्हणतात, माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच शिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी भगवान शंकर सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने संचार करतात. कलियुगात या दिवशी केलेले व्रत कमी परिश्रमात साध्य होऊन पुण्यप्रद तसेच सर्व पापांचा नाश करणारे आहे. जी मनोकामना मनात ठेवून व्यक्ती या दिवशी व्रत करेल, ती कामना अवश्य पूर्ण होईल. या जगात जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला शिवरात्र असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या पापांमुळे कलुषित झालेले मन शुद्ध होते. जो मनुष्य शिवरात्रीला भगवान शंकराची पाच मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्त होतो. ओम सद्योजाताय नम:, ओम वामदेवाय नम:, ओम अघोराय नम:, ओम ईशानाय नम: आणि ओम तत्पुरुषाय नम: असे हे पाच मंत्र आहेत.
या दिवशी स्त्री-पुरुषांनी स्नानादी नित्यकर्म आटोपून सर्वप्रथम शिवपुत्र गणेशाचे स्मरण करून शंकराच्या मंदिरात वा घरात शिवलिंगासमोर उभे राहून व्रताचा संकल्प करावा. महाशिवरात्रीच्या व्रतात उपवासाला महत्त्व आहे. यावेळी रुद्रपठण आणि रुद्राभिषेकालाही मोठे महत्त्व आहे. पंचाक्षरमंत्र म्हणजेच ओम नम: शिवाय या मंत्राद्वारे पवित्र पाणी, गायीचे दूध, पंचामृत आदींनी शिवलिंगाला अभिषेक करावा. शिवरात्रीच्या चारही प्रहरांमध्ये पृथक पूजनाला विशेष महत्त्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी दुधाने, दुस-या प्रहरी दह्याने, तिस-या प्रहरी तुपाने तर शेवटच्या आणि चौथ्या प्रहरी मधाने शिवलिंगाला अभिषेक केल्याने इच्छित कामना पूर्ण होतात. रात्रभर जागणा-या भक्तांनी पंचाक्षरी मंत्र किंवा शिवस्तोत्राचे पठण करावे. शिवरात्रीला झोपणे म्हणजे अनंत पुण्यराशींना मुकणे, असे सांगितले जाते. त्यामुळे प्रयत्नपूर्वक जागे राहण्याचा प्रयत्न करावा. अर्थात, जे लोक काही कारणांमुळे संपूर्ण रात्रभर जागरण करू शकणार नाहीत, त्यांनी अर्ध्या रात्री उपलब्ध होणा-या महानिशीथकालात पूजन करून नंतर झोपावे, असे म्हणतात.

पुराणात दिलेल्या माहितीनुसार, शिवरात्रीचे व्रत केवळ शैवच नव्हे तर वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर अशा सर्व संप्रदायाच्या व्यक्तींसाठी अनिवार्य आहे. प्राचीन काळात राजा भरत, मान्धाता, शिबि, नल, नहुष, सगर, युयुत्सु, हरिश्चंद्र आदी महापुरुषांनी तसेच स्त्रियांमध्ये लक्ष्मी, इंद्राणी, सरस्वती, गायत्री, सावित्री, सीता, पार्वती, रति आदी देवींनी शिवरात्रीच्या व्रताचे श्रद्धापूर्वक पालन केले होते. महाशिवरात्रीला व्रत केल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला व्रत करून शिवार्चन केल्यास असाध्य कामेही साध्य होतात, अशी धारणा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही महाशिवरात्रीचे महत्त्व मोठे आहे. या तिथीला चंद्रकोर क्षीण असते. सृष्टीला ऊर्जा देण्याचे सामर्थ्य चंद्रामध्ये उरत नाही.

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. त्यामुळेच चंद्राच्या कलेप्रमाणे मनाचे भाव कमी-जास्त होत असतात. अनेकदा व्यक्ती खूप दु:खी असते आणि मानसिक अडचणींचा समना करीत असते. चंद्र हा भगवान शंकराच्या डोक्यावर वास करतो. म्हणूनच चंद्राची कृपादृष्टी प्राप्त करायची असल्यास शंकराची पूजा केली जाते. तसे केल्यास चंद्र बलशाली होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला क्षीण चंद्रकोर असताना शंकराची पूजा करता आली नाही, तरी महाशिवरात्रीला ती करावीच, असे शास्त्र सांगते. महाशिवरात्रीच्या वेळी सूर्यही उत्तरायणात असतो. हीच ऋतुबदलाचीही वेळ असते. वसंत ऋतू उंबरठ्याशी असतो. त्यामुळे मन उल्हसित असते. याचवेळी कामदेवाचाही विकास होतो. कामजनित भावनांवर अंकुश ठेवण्यासाठी भगवान शंकराचीच उपासना उपयुक्त मानण्यात आली आहे. काही वेळा शिवरात्रीच्या दिवशी तिथीक्षय होऊन त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या यांचा संगम होतो. अशी महाशिवरात्र अतिउत्तम मानली जाते.

भगवान शंकरांनी याच दिवशी ब्रह्मारूपातून रुद्ररूपात प्रवेश केला, असेही एक कथा सांगते. या दिवशी भगवान शंकर तांडव करून तसेच आपला तिसरा नेत्र उघडून संपूर्ण विश्वाचा नाश करतात, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीला कालरात्री असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रात शंकराला सुखाचा आधार मानले आहे. अनेक ग्रंथांत शिवरात्रीच्या वेगवेगळ्या आराधना सांगण्यात आल्या आहेत. अनेक प्रकारांची अनुष्ठाने या दिवशी केली जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, बारा शिवरात्री असतात आणि त्यातील एक महाशिवरात्र असते. माघ महिन्याच्या शेवटी ही चतुर्दशी येते आणि तेथूनच फाल्गुन मासारंभ होतो. हाच भगवान शंकराचा प्रिय दिवस असून, त्या दिवशी शिवाची आराधना केल्याने पुण्यफल मिळते, असे सांगितले जाते.

सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR