लातूर : प्रतिनिधी
महागाई, बेरोजगारीमुळे सध्याचा काळ अनेक अडचणींचा, समस्यांचा बनला आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यासाठी आणि देशाचा विकास साधण्यासाठी जनतेला आता परिवर्तन हवे आहे, त्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहून या निवडणुकीत डॉ. शिवाजी काळगे यांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभेचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर ग्रामीण मतदारसंघामधील औसा तालुक्यातील वानवडा येथे शिवशंकर काळे, टाका येथे ज्ञानेश्वर शिंदे, बिरवली येथे गुणवंत कदम आणि सुरेश चव्हाण, जायफळ येथे प्रकाश भोंग आणि वडजी येथे शाहू मुळे यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मला आपला आमदार म्हणून निवडले. त्याच पद्धतीने आता डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने आपला खासदार म्हणून आपण सर्वांनी निवडावे. त्यावेळी आपण सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारासाठी, लोकांच्या विकासासाठी काम केले. तसेच काम या लोकसभा निवडणुकीत आपण करावे. सरपंच ते खासदार हे लोकप्रतिनिधी एका विचारांचे असतील तर आपला, आपल्या भागाचा विकास अधिक गतीमान होऊ शकतो.
लातूरमध्ये रेल्वे बोगी कारखाना आला. मात्र, तो अद्याप सुरू झाला नाही. आपण ७ वर्षे बंद असलेला संत शिरोमणी मारोती महाराज साखर कारखाना सुरू केला. शेतक-यांच्या मुलांना हार्वेस्टर दिले. या माध्यमातून लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार आपण निर्माण केला. केवळ विकासाची जाहिरात करणारे केंद्र सरकार प्रत्यक्ष विकास करू शकले नाही, रोजगार देऊ शकले नाही. याबद्दल आपण त्यांना जाब विचारला पाहिजे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.
यावेळी श्रीपतराव काकडे, शाम भोसले, अनुप शेळके, धनंजय देशमुख, सतीश शिंदे, महेंद्र भादेकर, सचिन दाताळ, सचिन पाटील, नारायण लोखंडे, सदाशिव कदम, प्रवीण पाटील, संदीपान शेळके, विलास पाटील, रवी पाटील, अजित काळदाते, निर्गुण साळुंके, प्रकाश भोंग, परशूराम मिरकले, शहाजी पाटील, नागनाथ काळे, भरत पाटील, दगडू मुळे, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.