नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तरप्रदेशातील रायबरेली व अमेठी या दोन्ही काँग्रेसच्या परंपरागत लोकसभा मतदारसंघातून यावर्षी गांधी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत आहे.
उत्तरप्रदेशातील ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १७ लोकसभा मतदारसंघ आले आहेत. यापैकी १३ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा काँग्रेसने केली. परंतु चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्यापही केलेली नाही. यात रायबरेली, अमेठी, मथुरा व अलाहाबाद (प्रयागराज) या मतदारसंघांचा समावेश आहे. रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढवणार नसल्याने या मतदारसंघात कोण उमेदवार राहणार हे स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हे दोन्ही मतदारसंघ केवळ गांधी कुटुंबीयांसाठी सोडू. काँग्रेसचा इतर उमेदवार येथे चालणार नाही, असे स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील या मतदारसंघांबाबत काँग्रेसने अद्यापही मौन सोडलेले नाही. उत्तरप्रदेश काँग्रेस समितीने या दोन्ही मतदारसंघात गांधी कुटुंबातील उमेदवार असावा, असा प्रस्ताव पारित केला आहे.