38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसोलापूरगावागावांतून मराठा समाज लोकसभेसाठी उमेदवार देणार

गावागावांतून मराठा समाज लोकसभेसाठी उमेदवार देणार

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता सोलापूर जिल्ह्यातील मादा आणि बाशी पाराशिव या सर्वसाधारण मतदारसंघात समाजाचे तर राखीव असलेल्या सोलापूर मतदारसंघात पाठिंबा देऊन अनुसूचित जातीचे उमेदवार गावागावांतून उभे करून त्यांना निवडून आणण्याचा एकमुखी निर्णय सोलापुरात झालेल्या समाजबांधवांच्या बैठकीत घेण्यात आला.

सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने मराठा आरक्षण योध्दा मनोज जररांग पाटील यांच्या आवाहनानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत समाजाची भूमिका काय असणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील मराठा बांधवांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अखेर या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील गावागावांमधून आणि तालुक्यातून किमान दोन ते चार उमेदवार उभे करून अथवा राखीव मतदारसंघात अनुसूचित जातींचे उमेदवार उभे करून त्याठिकाणी त्या उमेदवारांच्या निवडणुकीचा सर्व खर्च समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून पेटलेला मराठा समाज आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर, माढा आणि बाशीं धाराशिव या सोलापूर जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे अथवा मराठा समाज पुरस्कृत अनुसूचित जातीचे अनेक उमेदवार एकाचवेळी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून सताधाऱ्यांबरोबर विरोधकांचीही दमछाक करणार असल्याचे या निमित्ताने आता स्पष्ट झाले असून यातील काही उमेदवारांची नावेही त्यांनी या बैठकीत जाहीर केले आहेत. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्याबाबतीत सरकारकडून फसवणूक करण्यात आल्याने समाजाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ७५वर्षानंतर व्यवस्थेला हात घालण्याचे काम आता समाज करणार असून समजतो तेवढी ही लढाई सोपी नाही. परंतु, मराठा समाजाची फसवणूक केलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि याबद्दल कोणतीही भूमिका न घेणाऱ्या विरोधकांना यातून धडा शिकविल्याशिवाय समाज आता गप्प बसणार नाही. राजन जाधव म्हणाले, ज्यांना उमेदवारी भरावयाचे आहे. त्या समाजातील सर्वांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घ्यावी. अनुमोदक व सूचक लागतात तेही तयार करावे. या कामासाठी एखादी कमिटी गठीत करण्यात यावी.

बाशीचे कपिल कोरके म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मराठा समाजाला एकत्रित करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तालुक्यातील गावागावांमधून जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे राहतील, याची आपण काळजी घेऊ. सोलापूरचे चंद्रकांत पवार म्हणाले, सरकारने समाजाची फसवणूक केल्याने सरकारला जेरीस आणण्यासाठी समानाने या निवडणुकीत काम करायचे आहे. तर पंढरपूरचे किरण घाडगे म्हणाले, मराठ्यांनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, हे सरकारने लक्षात घ्यावे. यावेळी मोहोळचे अँड. श्रीरंग लाळे, करमाळ्याचे प्रा. रामदास झोळ, सांगोल्याचे अरविंद केदार, माढ्याचे बंडू ढवळे, पंढरपूरचे प्रा. महादेव तळेकर, संदीप मांडवे यांनी सरकारविरोधी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत निवडणुकीत एकत्रित येण्यासाठी समाजाला एकीची हाक दिली. तसेच गरजवंत मराठ्यांनी काम करावे आणि दानशूर आणि दान करावे निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी वार रूम तयार करण्याच्या सूचनाही काहीजणांनी केल्या. या बैठकीस पुरुषोत्तम बरडे, जयकुमार माने, नागेश ताकमोगे, राजन जाधव, रवी मोहिते, श्रीकांत डांगे, महादेव गवळी, चंद्रकांत पवार, लहू गायकवाड, दता मुळे, ज्ञानेश्वर सपाटे, प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, सुरेश जगताप, जीवन यादव, दता भोसले, नलिनी जगताप, लता ढेरे, मनीषा नलावडे, भक्ती जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गणेश देशमुख यांनी केले.

मंगळवेढ्याच्या क्रांती दामोदर दत्तू व नंदा ओमणे यांना माढ्यातून तर सोलापूर राखीव मतदारसंघात गवळी वस्ती तालीम संघातर्फे ईश्वर आहिरे, अशोक बनसोडे, शेखर कवठेकर व बाळासाहेब वाघमारे यांना मराठा समाजातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐकणारे हे सरकार असल्याने त्यांच्याविरोधात पंढरपूरचे संदीप मांडवे व प्रा. महादेव तळेकर हे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR