नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला.
यामुळे केजरीवाल यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे. अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ मार्च रोजी अटक केली होती आणि ते १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही आणि तपास यंत्रणा ईडी ने केलेली त्यांची अटक योग्य असल्याचे सांगितले.